सांगली : कोयनेसह विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, सुरू असलेली पावसाची संततधार आणि कृष्णामाईच्या पाणी पातळीत क्षणा-क्षणाला वाढ होत असल्याने महापूर उंबरठ्यावर आलेला. अशा दुथडी भरून वाहत असलेल्या कृष्णा नदीच्या प्रवाहात पाळण्यातून एका मुलाचा तब्बल अर्धा किलोमीटर प्रवास झाला तोही नवसपूर्तीसाठी.
सांगलीत नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर नवसाने मुलगा झाला. यानंतर कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेवून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नवस फेडण्यात आला. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली.
कर्नाटकातील निपाणी गावात राहणारे रवींद्र वळावे. त्यांचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर अनेक वर्षे लोटली, तरीही दाम्पत्याला मूल होत नव्हते. अनेक प्रयत्न करून हे दाम्पत्य थकले. रवींद्र वळावे यांचे आजोळ हे सांगली. या आजोळी असणाऱ्या नातेवाइकांनी त्यांना पूर्वापार चालत आलेल्या परंपरेची माहिती दिली. यानंतर या दाम्पत्याने सांगलीत येऊन चार वर्षांपूर्वी मूल व्हावे असा नवस केला होता. या नवसानंतर त्यांना एक मुलगा झाला. यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबीयांसह सांगलीतील सरकारी घाटावर आले होते. कृष्णा माईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला. कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस फेडण्याची लगबग सुरू झाली. कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात वीर या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आले. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आला.
कोयना धरण क्षेत्रासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यातच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडल्याची अनोखी प्रथा पाहायला मिळाली. नेहमीच कृष्णामाईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या तरुणांनी धाडसाने वाहत्या पाण्यात नवस फेडण्याचे हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले.