Devendra Fadnavis : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्यानिमित्ताने आज अहिल्यानगरमधील चौंडीत भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राम शिंदे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, चौंडी हे प्रेरणा आणि उर्जास्थान आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना घेतला. खरं म्हणजे राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचं आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ. मोदींनी सांगितलं की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर मी सभा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र, पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशात देखील मोठा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला थोडा उशीर झाला होता. मात्र, तरीही मला विश्वास आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर देखील अनेक संकटे आली. पतीच्या निधनानंतर मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आता प्रजेची काळजी घ्यावी लागेल. पण संकटे किती यावेत? सासरे, सासू, पती, मुलगा, मुलगी, जावई, असे एकापाठोपाठ एक सोडून गेले. मात्र, तरीही अहिल्यादेवी होळकर डळमळल्या नाहीत. कारण त्यांना माहिती होतं की संपूर्ण राज्य हा त्यांचं कुटुंबिय आहे. त्यांनी जवळपास २८ वर्ष राज्यकारभार चालवला. देशाच्या इतिहासात कल्याणकारी जे राजे झाले, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घ्यावं लागेल”, असं फडणवीसांनी म्हटलं.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं एक वाक्य फार छान होतं. त्या म्हणायच्या की, राष्ट्रभावना आणि धर्मभावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे. त्या म्हणायच्या की, स्नान केल्याने शरीर सुद्ध होतं, ध्यान केल्याने मन सुद्ध होतं आणि दान केल्याने धन सुद्ध होतं. खरं तर देशभरात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरं बांधले, तलावं बांधले. घाटांचे बांधकाम केले, पण त्यासाठी एकही पैसा त्यांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीच्या पैशातून खर्च केला नाही, तर स्वत:च्या पैशातून हे कामे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्शमाता होत्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“अहिल्यादेवी होळकर यांच्या २८ वर्षांच्या राज्यकारभारात कोणाची हिंमत हुंडा मागण्याची नव्हती आणि देण्याची देखील नव्हती. अहिल्यादेवी होळकर यांनी हुंड्याची प्रथा बंद केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या दरबारात दोन वाक्य लिहिलेले होते. दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून येथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये. तसेच दुसरं होतं की माणसांचे चारित्र्य असं असावं की वाहून जाईल ते गंगाजल आणि राहिल ते तीर्थ, हे अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं. त्यामुळे आज ३०० वर्षांनंतर देखील आपण त्यांचं नाव काढतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “कधी-कधी इतिहास हा फार क्रूर असतो. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता दुर्देवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या नव्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की चित्रपट हे असं माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर बहुभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.