Devendra Fadnavis Poems: “माझ्या जीवनात मॉडेलिंग हा अपघात होता. माझ्या मित्रांनी माझ्याबरोबर केलेला तो एक प्रँक होता. पण तो त्यावेळी चालून गेला. मी सुदैवाने वाचलो. पण त्यानंतर मी कधीही मॉडेलिंगचं साहस केलं नाही. माझं त्यावेळेस गाजलं त्याचं वेगळं कारण होतं. कारण कुत्रा माणसाला चावला तर त्याची बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते. त्यामुळं माझ्या मॉडेलिंगची बातमी झाली”, अशी आठवण सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी मुंबईतील रेडिओ महोत्सवाच्या कार्यक्रमात सांगितल्या.

“महाविद्यालयात असताना मला कविता, गाणी लिहायचा छंद होता. अगदी लहान असताना मी कविता लिहिल्या होत्या. फक्त लिहिल्यानंतर मी ते कधी साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचो आणि स्वतःच वाचायचो. पण नुकतेच मी राम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामावर आणि भगवान शंकरावर गाणं लिहिलं आहे. शंकर महादेवन यांनी ते गायलं आहे”, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

जागतिक संगीत दिनाच्या औचित्याने आज मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटर येथे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

मी रामदास आठवले घराण्याचा कवी

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, एक गाणं मी लिहिलेलं असून ते तुम्ही यूट्यूबवर शोधलं तर सापडेल. पण मी त्याचं नाव सांगणार नाही. यावेळी आरजे भूषण यांनी त्यांना कुठल्याही चार ओळी ऐकवून दाखवा, असा आग्रह धरला. यावर फडणवीस म्हणाले की, मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे.

यावेळी फडणवीस यांना शीघ्रकविता ऐकवून दाखण्याचा आग्रह आरजेंनी केला. यावर फडणवीस यांनी म्हटले..

तुम्ही आहात आरजे,
मला येत नाही फारसे,
बाहेर लावलेत आरसे…

यानंतर फडणवीस यांनी स्वतःची एक कविता ऐकवून दाखवली. जी त्यांनी फार पूर्वी लिहिली होती. ती खालीलप्रमाणे…

तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो,
तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो,
नसेना का अर्थ, अनर्थ तर असतो,
अरे तुम्ही काय कविता कराल,
पण, आणि, किंवा, परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे,
कविता म्हणजे,
जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा कवितेचा व्हिडीओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं एक गाणं पत्नी अमृता फडणवीस यांनी गायल्याचंही सांगितलं. पण ते गाणं कोणतं, हे तुम्हीच यूट्यूबवर शोधा, असंही सांगितलं.