शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी बुलढाणा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांना औरंगजेब म्हणा, असे म्हटले होते. या टीकेची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिंदे गटाच्या वतीने आज वरळी डोम येथे पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव टाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांचीच औरंगजेबाप्रमाणे वृत्ती असल्याची टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी करणे हे दुर्दैव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नवा आयाम दिला, नवी उंची दिली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कलम ३७० हटविण्याचे जे स्वप्न होते, ते मोदींनी पूर्ण केले. पंतप्रधान मोदींना औरंगजेबाजी उपमा देणे, हा देशाचा अपमान असून देशद्रोह आहे. त्यामुळे संजय राऊत यांची निंदा करावी तेवढी कमी आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर, “औरंगजेब हे १०४ थं दुषण…”

उद्धव ठाकरे यांची औरंगजेबी वृत्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “औरंगजेबाची वृत्ती कुणी दाखवली, हे सर्वांना माहीत आहे. औरंगजेबाने आपल्या भावाला सोडलं नाही, बापाला आणि नातेवाईकांना सोडलं नाही. तीच वृत्ती यांनी दाखवली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु या आरोपाचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून देईल.”

हे पण वाचा – नरेंद्र मोदी, अमित शहांमध्ये औरंगजेबी वृत्ती; उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले ‘यंदा देशात परिवर्तन अटळ’

शेपूट घालणाऱ्यांनी इतरांवर बोलू नये

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री देशात सगळीकडे जातात आणि मणिपूरमध्ये शेपूट घालतात, अशीही टीका उबाठा गटाकडून करण्यात आली होती. या टीकेलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कलम ३७० हटवलं. त्यांनी अनेकवेळा देशभक्तीचा परिचय करून दिला आहे. त्यामुळं त्यांना शेपूट घालणं म्हणणं हे मर्दमुकीचं उदाहरण नाही. खरं म्हणजे फोटोग्राफरना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना शेपटीशी अधिक प्रेम झाले. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाऊन लोटांगण घालणारे आणि नोटीस आल्यानंतर ज्यांना घाम फुटतो, तेच वेळेवर शेपूट घालणारे आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी शेपूट घातले, त्यांनी इतरांवर बोलू नये.”