Bhai Jagtap On BMC Election : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. सर्वच पक्षाचे नेते मंडळी आपआपल्या पक्ष संघटनेचा कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत. याच अनुषंगाने नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत. या आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. यातच काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान करत ‘राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेण्याची इच्छा आहे’, असं म्हटलं होतं. मात्र, आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी एक मोठं विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

‘आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे तर सोडा, आम्ही उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणुका लढणार नाही’, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चांनी जोर धरला आहे. भाई जगताप यांनी काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचे थेट संकेतच दिले आहेत. भाई जगताप यांनी हे विधान आयएएनएसशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

भाई जगताप काय म्हणाले?

“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती”, असं विधान भाई जगताप यांनी केलं आहे.

“आता देखील काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये आमच्या जवळपास सर्वच लोकांनी हेच सांगितलं. आमचे काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला हे देखील होते. आम्ही त्यांना सांगितलं ही एकतर या स्थानिक निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका नेत्यांच्या नाहीत. कार्यकर्त्यांच्याही इच्छा असतात की आपणही कधी ना कधी निवडणूक लढवल्या पाहिजेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तर त्यांना या निवडणुका लढू दिल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला शिवसेनेबरोबरही गेलं नाही पाहिजे आणि राज ठाकरेंबरोबर जाण्याचा तर प्रश्नही नाही”, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

भाई जगताप पुढे असंही म्हणाले की, “आम्ही आमची मते मांडली आहेत. आतापर्यंत काँग्रेसने कधीही असं म्हटलेलं नाही की राज ठाकरे यांना बरोबर घेऊ आणि म्हणणारही नाही. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांचा एक पक्ष नाही तर सर्व मिळून आघाडी आहे. जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांची एकच शिवसेना होती, पण आता दोन-दोन शिवसेना झालेल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणतात? किंवा त्यांना काय ठरवायचं हा त्यांना अधिकार आहे. पण काँग्रेस तसा काही निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना या स्थानिक निवडणुकीत निर्णय घेऊ घेऊ दिला पाहिजे”, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.