करोना संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालंय अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ तारखेपासून शाळा सुरु कऱण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा निर्णय नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असेल. एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

“मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न असणार आहे. कारण पुन्हा निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचं पुढील वर्षी प्रवेश घेताना नुकसान होईल. आम्ही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मंत्रीमंडळात यासंबंधी कल्पना दिली आहे. साधारणत ही परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होते. पण सध्या तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे २३ तारखेपासून नववी, दहावी, अकरावी, बारावीच्या शाळा सुरु कराव्यात अशी विनंती केली आहे,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी अकरावी प्रवेशासंबंधीही माहिती दिली. “बैठकीनंतर मुख्यमंत्री, अशोक चव्हाण आणि मी असे सगळेजण चर्चेसाठी बसलो होतो. अकरावी प्रवेशाबाबत आज निर्णय होईल. येणाऱ्या काळात कदाचित आम्ही प्रवेश सुरु करु”.

शाळांना १२ ते १६ नोव्हेंबपर्यंत दिवाळी सुट्टी
राज्यातील पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवस दिवाळी सणाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील, असे शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

करोना प्रादुर्भावामुळे चालू शैक्षणिक वर्षांत शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू न करता २२ जुलैपासून पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू होता.

माध्यमिक शिक्षण संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकू ण सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच कामाचे एकू ण दिवस २३० होणे आवश्यक आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे एकू ण दिवस २०० व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकणिाऱ्या शिक्षकांच्या कामाचे दिवस २२० होणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सणाची शाळा सुट्टी घोषित करण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारवर
विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून या शिक्षणसंस्था कधी आणि कशा सुरू कराव्यात याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे, तर केंद्रीय विद्यापीठांबाबतचा निर्णय कुलगुरूंवर सोपवण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने शिक्षणसंस्था सुरू करण्याची सूचना आयोगाने दिली आहे.

नव्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता आयोगाने प्रत्यक्ष महाविद्यालयांचे वर्ग भरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शिक्षणसंस्था सुरू करण्यासच आयोगाने परवानगी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.