सध्याच्या राजकारणात कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी याचा शोध घेताना काँग्रेस पक्षाला तरी पुरोगामी कसे म्हणायचे, असा सवाल करीत, ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला, लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत केले. संसदेत हिंदू कोड बिल मांडण्याच्या मुद्यावर आंबेडकरांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारी काँग्रेसच प्रतिगामी आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या नूतन प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रा. डॉ. वाघमारे यांनी प्रथमच सोलापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाचे गोडवे गाताना उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री शिंदे यांची कार्यशैली, निर्णयक्षमता, सामान्य नागरिकांना तत्परतेने मदत करण्याची धमक, सामान्यजनांविषयीचा कळवळा आणि विचारांची पक्की बैठक पाहूनच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सर्वसमावेशक हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांनीच दिले असून त्याचा वारसा ख-या अर्थाने एकनाथ शिंदे हेच चालवत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना पूर्णतः नैराश्याने ग्रासले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी ४० आमदारांच्या विरोधात ते शिवराळ भाषा वापरत आहेत. हरामखोर कोण ? गद्दार कोण, याचा राज्यातील सामान्य जनताच घेणार असल्याचे प्रा. वाघमारे यांनी सांगितले. उध्दव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भाकिते सतत चुकत आहेत. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास होण्यासाठी आपण त्यांना लवकरच सोलापूरच्या दाते पंचांगकर्त्यांचे पंचांग भेट देणार आहोत, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा दावाही त्यांनी केला.