खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्षावरील हक्क याबाबतची लढाई निवडणूक आयोतच लढावी लागणार आहे. असे असताना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटाला उत्तर आहे. देशातील स्वायत्त संस्थांच्या कामकाजाला आव्हान देणे चुकीचे असते. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…

आपल्या समोरचे पुरावे पाहून निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्यांची याचिका फेटाळणे हेच त्यांना मिळालेले उत्तर आहे, असे त्यांनी समजून घेतले पाहिजे. भारतात निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्था आहेत. या संस्था योग्य रितीने काम करत असतात. मात्र त्यांच्या कामकाजाला आव्हान देणे हे चुकीचे असते. सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय दिला आहे. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा >>> शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

न्यायालयाने काय निर्णय दिला?

अखेर घटनापीठाने आज (२७ सप्टेंबर) पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गटाने याबाबत निवडणूक आयोगाची कार्यवाही रोखण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवेसना पक्षावरील प्रभुत्व तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची लाढाई आता उद्धव ठाकरे गाटाला निवडणूक आयोगातच लढावी लागणार आहे.