लोकसत्ता वार्ताहर
लातूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी वारंवार जाऊ नये. राज ठाकरे हे मुंबईचे अर्थकारण बिघडवणारे व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. शनिवारी आठवले लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, राज ठाकरे हे प्रत्येक वेळी नवे विषय काढून समस्या निर्माण करत आहेत, लोकांमध्ये गैरसमज वाढवत आहेत. मुंबईचे अर्थकारणच त्यांच्यामुळे बिघडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाऊ नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला. आठवले म्हणाले, राहुल गांधींचे नेतृत्व हे ताकदवान नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस फोफावणार नाही. २०२९ व २०३४ अशा पुढच्या दहा वर्षांत पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.
पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा असणे त्यात गैर नाही, हिंदी सर्वांना आली पाहिजे असे म्हणत राज्य शासनाच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा वंचित विकास पक्ष विसर्जित करावा व त्यांनी रिपाइंमध्ये यावे व अध्यक्षपद स्वीकारावे असेही आठवले म्हणाले.