Devendra Fadnavis Cabinet interesting facts : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) नागपूर येथे पार पडला. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जातीजमातीची समीकरणं साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का देत तरुण व नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देत ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. १० दिवसांपूर्वी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता. हे तीन आणि नवे ३९ असे एकत्रित ४२ मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

नव्या मंत्र्यांचा शपथविधी व त्यानंतरची कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे. आमचं मंत्रिमंडळ हे सर्वसमावेशक असं आहे”. फडणवीसांनी त्यांचं मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असल्याचं वक्तव्य केलं असलं तरी त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक जिल्ह्यांची पाटी कोरीच असल्याचं पाहायला मिळत आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यातील १९ जिल्ह्यांमधील किमान एका तरी आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. तर १६जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळालेलं नाही. एकट्या सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. तर, विदर्भातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांचा मंत्रिमंडळात प्रतिनिधी नाही.

या १९ जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळाली

अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, ठाणे, नाशिक, यवतमाळ, बीड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, नागपूर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे १६ जिल्हे वंचित

नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, पालघर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळाबाबतचे २० महत्त्वाचे मुद्दे

  1. सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रिपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
    पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
  2. नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत.
  3. नाशकात दादा भुसे, माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
  4. जळगावात गुलाबराव पाटील, गिरीश महाजन व संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
  5. रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत, तर एक राज्यमंत्री मिळाले आहेत. उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तर योगेश कदम यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
  6. रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे.
  7. कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.
  8. ठाणे जिल्ह्याला तीन मंत्री लाभले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, गणेश नाईक व प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे.
  9. मुंबईला मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत.
  10. राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे.
  11. राज्यातील १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. या जिल्ह्यांमधून एकूण ७९ आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी बहुसंख्य आमदार हे सत्ताधारी पक्षांचे आहेत.