संदीप आचार्य आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्हीबाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह केअर)आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे बऱ्याचवेळा घरच्यांनाही शक्य होत नाही. या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी मॉर्फिनची इंजेक्शन्स देण्यासह विशेष काळजी घ्यावी लागते. गोरगरीब रुग्णांना यासाठी येणारा खर्च परवडणारा नसतो तसेच काळजी घेणेही शक्य होत नाही हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता राज्यातील ३४ जिल्ह्यात ही ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पॅलेटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील असे क्षेत्र आहे जे केवळ दुर्धर आजारांवर उपचार करत नाही तर वेदनांपासून रुग्णाला आराम मिळवून देण्याबरोबरच मानसिक वेदना कमी करण्यासही मदत करते. यासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी यांची आवश्यकता असून आरोग्य विभागाने यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. केंद्र शासनाने २०१२मध्ये अशा दुर्धर आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा आणि या व्यवस्थेतील डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. ही योजना देशातील १८० जिल्ह्य़ांत लागू करण्यात येणार होती. त्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश होता. २०१२ मध्ये वर्धा व वाशिम जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली होती. आरोग्य विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी या योजनेसाठी पुढाकार घेऊन इगतपुरीला दुर्धर आजारावरील उपचार व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली होती. तसेच आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘पॅलेटिव्ह सेंटर’ उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा तसेच सातारा व नंदुरबार या सहा ठिकाणी ही केंद्रे २०१४-१५ पर्यंत सुरू करण्यात आली. यानंतर २०१८-१९ मध्ये सिंधुदुर्ग,पुणे, नाशिक, परभणी, जलना, पालघर, रत्नागिरी, नांदेड व उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यात ही योजना सुरु करण्यात आली. २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात नागपूर, औरंगाबाद, जळगाव, लातूर, बीड, हिंगोली, ठाणे व अहमदनगर या आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला तर आता आरोग्य विभागाने नव्याने अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, रायगड, गोंदीया, धुळे व सोलापूर या जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले. विश्लेषण: काही व्यक्तींना मुळातच कमी झोप कशी येते? हे गुणसूत्रांमुळे घडते? नवीन अभ्यास काय सांगतो? आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच आशांपासून यंत्रणेतील अनेकांना पॅलेटिव्ह केअर विषयक प्रशिक्षण तर दिलेच. शिवाय घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण आहेत का, याची माहिती घेण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. दीर्घ व गंभीर आजारांचे रुग्ण आशा तसेच एएनएमच्या मदतीने शोधून त्यांना आरोग्य सेवा देण्याबरोबरच घरातील व्यक्तींना आवश्यक आरोग्य विषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तसेच औषधोपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेची यशस्वीता ही आशा कार्यकर्त्यांवर अवलंबून असल्यामुळे आशांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पॅलेटिव्ह रुग्णांसाठी दहा खाटांची व्यवस्था करण्यात असून या योजनेने मागील दोन वर्षात वेग घेण्यात सुरुवात केल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. २०२०-२१ मध्ये बाह्यरुग्ण व आंतररुग्ण मिळून ३९४७ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर १२३३ ठिकाणी प्रत्यक्ष घरी भेटी देण्यात आल्या. २४०२ रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार देण्यात आले. २०२१-२२मध्ये यात वाढ होऊन ३६ हजार ८२० बाह्यरुग्ण व आंतरुग्णांवर उपचार करण्यात आले. २२ हजार ७७२ रुग्णांच्या घरी जाऊन भेटी देण्यात आल्या तर ४२ हजार ९७८ रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार या योजनेअंतर्गत तत्ज्ञांकडून देण्यात आला. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात आतापर्यंत दहा हजार ९७१ पॅलेटिव्ह केअर आवश्यक असलेल्या रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले वा दाखल करण्यात आले तर ५५९९ रुग्णांच्या घरी जाऊन पॅलेटिव्ह केअरच्या पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन भेटी दिल्या. याशिवाय ८३२७ रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम करण्यात आले. आजघडीला देशत १२ टक्के रुग्णांना पॅलेटिव्ह केअरची आवश्यकता असली तरी प्रत्यक्षात चार टक्के रुग्णांनाही ही व्यवस्था उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रात ही योजना परिणामकारक करून दुर्धर आजारांच्या जास्तीतजास्त रुग्णांवर उपचाराची फुंकर घातली जातली जाईल असे डॉ पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.