हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. सोमवारी नांदेड आणि हिंगोली दौऱ्यामध्ये शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी हिंगोलीमधील जाहीर भाषणात मुख्यमंत्री शिंदेंनी नीति आयोगाच्या बैठकीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार राज्याला विकासाच्या मार्गावर नेईल असा विश्वास व्यक्त केला.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

भाषणाच्या सुरुवातीलाच शिंदेंनी संतोष बांगर यांनी सभेसाठी जमवलेली गर्दी पाहून आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. “खऱ्या अर्थाने तो लोकांमध्ये जातो आणि बोलतो हे पाहून ही समोरची गर्दी पाहून त्यांची लोकप्रियता समोर आलीय. चालायला रस्ता नव्हा एवढी गर्दी, मुंगीलाही शिरायला जागा नाही अशी स्थिती आहे. या भागात अनेक वर्ष आपण संतोष सोबत काम करताय,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांचं कौतुक केलं. “मी राजकारणावर अधिक बोलू इच्छित नाही. हे सर्व सामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना ज्ञान देण्याचं काम करायचं आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

“मगाशी हेमंत पाटील म्हणाले केंद्र सरकारचंही आपल्याला पाठबळ आहे. हो मला आनंद आणि समाधान आहे सांगताना की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या राज्याला पुढे घेऊन जा. या राज्याची प्रगती करा, या राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा,” असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. तसेच, “पंतप्रधान मोदींनी तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही. केंद्र सरकार तुमच्या राज्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं असेल असंही सांगितलंय,” असं शिंदे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही संदर्भ यावेळेस शिंदेंनी दिला. “गृहमंत्र्यांकडे सहकार खातं आहे. त्यांनीही सांगितलंय की या राज्याच्या विकासात काहीही कमी पडू देणार नाही,” असं शिंदे म्हणाले. पुढे शिंदे यांनी, “राज्य आणि केंद्र सरकार मिळून काम करेल. हे डबल इंजिनचं सरकार आहे. काल मी नीति आयोगाच्या बैठकीत होतो. हजारो कोटींचे प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवलेत. आपल्या राज्याचे हे प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करेल असा मला विश्वास आहे. या माध्यमातून आपल्या राज्याला मोठी मदत होईल असा मला विश्वास आहे,” असंही म्हटलं.

यावेळी बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ कावड यात्रे’मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत मुखी भगवान भोलेनाथाचा जयघोष करत तसेच हाती भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे देखील सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, आमदार बांगर, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर तसेच हजारोंच्या संख्येने हिंगोलीकर शिवभक्त उपस्थित होते.