Eknath Shinde Speech: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा (ठाकरे गट आणि शिंदे गट) ५९ वा वर्धापन दिन पार पडला. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकमेकांवर खरपूस टीका केली. वरळी येथे पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीका केली. ते म्हणाले की, “हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यामुळे ते माझ्याशी युती करता का? माझ्याशी युती करतात का? म्हणत किती आगतिक, उतावळे आणि लाचार झाले आहेत, हे आपण पाहत आहात.”
या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली, पण कधी विचार सोडले नाहीत. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला, पण हिंदुत्व सोडले नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली.”
ते पुढे म्हणाले की, “हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे, माझ्याशी युती करता का? म्हणून किती आगतिक, उतावळे आणि लाचार झाले आहेत, हे आपण पाहत आहात. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. पण सत्तेत असताना सर्वांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे? हे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे झाले आहे. सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती आली आहे.”
शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या युतीची चर्चा
दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याभरापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही सकारात्मक संकेत दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून याचीच चर्चा सुरू आहे.