नांदेड : १९७५ सालातील आणीबाणीच्या कालखंडात लोकशाही व न्याय्य हक्कांच्या लढ्यामध्ये बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा राज्य शासनामार्फत सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अशा व्यक्तींना अथवा त्यांच्या पत्नीस मानधन देण्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील ६८० जणांचा यात समावेश असून, त्यासाठी ४ कोटी ८३ लाख २५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२५ जून १९७५ ते २१ मार्ज १९७७ या दरम्यान तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणी जाहीर होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले होते. या आणीबाणीत महाराष्ट्रातील ३ हजार ७८२ जणांनी कारावास भोगला. त्यामध्ये मराठवाड्यातील ६८० जणांचा समावेश आहे. त्यांचा सन्मान, यथोचित गौरव करणेबाबत या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मानधन वितरीत करण्यासाठी २८ कोटी १२ लाख ५५५ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात मराठवाड्यासाठी ४ कोटी ८३ लाख २५ हजार रुपयांचा निधी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी वितरीत केलेल्या मानधनाचा अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेश अवर सचिव भाग्यश्री भाईडकर यांनी शासन निर्णयात दिले आहेत.
कुटुंबीयांना मिळाला दिलासा
महाराष्ट्रात आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना १९ महिने जेलमध्ये राहावे लागले होते. या काळात त्यांच्या कुटुंबीयांस अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. आता राज्यात व देशात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे आणीबाणीच्या विरुद्ध लढणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना या शासन निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
असे मिळणार मानधन
० एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना मासिक १० हजार रुपये
० हयात नसलेल्यांच्या पत्नीस अथवा पतीस ५ हजार रुपये
० एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना ५ हजार रुपये
० हयात नसलेल्यांच्या पत्नी अथवा पतीस २ हजार ५०० रुपये