राजापुर : कोल्हापूर व राजापूरला जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटात ४०० फूट खोल दरीत एर्टिका कार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला. या अपघातात लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कारचे इंजिन घाटातील रस्त्यावर येऊन पडले, तर कौस्तुभचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला. अपघातात कारचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी उघडकीस आला. कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून ३ जून रोजी कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता. रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा. ३ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अणूस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले. त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन आणि गाडीचे इतर भाग पुन्हा दिसले. यानंतर त्याने तात्काळ अणूस्कुरातील चेकपोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी याची दखल घेऊन अणूस्कुरा घाटात तपास सुरू केला. यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे दीडशे फूट खाली कौस्तुभ विजय कुरूप याचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला. तसेच गाडीचे भाग सुमारे ४०० फूट खोलवर विखुरलेले दिसले.या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक पोलीस तपास करीत आहेत.