ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची काल (८ फेब्रुवारी) निर्घुण हत्या झाली. मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून स्वतःही आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यात भाजपा आमदारानेही एकावर गोळीबार केला होता. राज्यात दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलेला असून लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, या मागणीला जोर धरू लागला आहे. या मागणीवरून फडणवीसांनी आज मोठं वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद राजकीय पटलावरून उमटत आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील.

नाना पटोलेंचं प्रत्युत्तर काय?

देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा यांच्यातील फरकही कळत नाही का?”

हेही वाचा >> “गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान

खैरात वाटल्यासारखे बुंदकांचे परवाने दिले जातात

“महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे, हे NCRB च्या अहवालात म्हटले आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो. त्यानंतर ठाणे, मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो. नागपूरच्या अधिवेशनात मी हे आकडेवारीसह मांडले होते. राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहेत. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. काही भ्रष्ट व कलंकित IPS अधिकाऱ्यांना नियम डावलून प्रमोशन दिले आहे तर प्रामाणिक व इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप व दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गुंडांनी शासन व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा”,असंही नाना पटोले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार

“वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरू आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप व दबावामुळे पोलीसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा”, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसंच, काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या १० फेब्रुवारी रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत.