लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आले असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
माढा येथे ओबीसी मेळाव्यासाठी आलेले असता आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर आगपाखड केली. ते म्हणाले, काँग्रेसकडून एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे केले जात आहे. भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमधून जाणार असताना तेथील तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड आदी पक्षांना सामावून घेण्याची अपेक्षा होती. परंतु त्याउलट घडामोडी घडत आहेत.
आणखी वाचा-“वीर सावरकर पळपुटे, आम्ही..”, खासदार इम्तियाज जलील यांची टीका, नव्या वादाची चिन्हं
राज्यात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी येत्या ३० जानेवारी रोजी आम्हांला महाविकास आघाडीने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार आम्ही चर्चेसाठी जाणार आहोत. यात काही विषयांवर मतभेद होत असतिल तर ते चर्चेतूनच सोडविण्याचा प्रयत्न करू. इंडिया आघाडीसारखी अवस्था निदान राज्यात महाविकास आघाडीची तरी होऊ नये, अशी आपली प्रामाणिक भावना आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.