महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रीय झाला असून मुंबई शहर, तसेच उपनगरांत बुधवारी (२६ जुलै) रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने मुंबईला शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, पुढच्या २४ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल. तर, राज्यासाठी पुढचे तीन ते चार तास खूप महत्त्वाचे असल्याचं भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितलं आहे.

आयएमडीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडेल.

हवामान विभागाने मुंबईला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पावसाचा वेग कायम असल्याचं पाहून हवामान विभागाने आता शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार भागात मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> “आम्ही आठ माळे चढू शकत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोल

हवामानशास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं की, राज्यातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पुढील २४ तासांत राज्यात मान्सून अतिसक्रिय असेल, तर त्यानंतरच्या २४ तासांत मान्सून सक्रिय असेल. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल.

हे ही वाचा >> बेफाम पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलैची आठवण, ‘हे’ फोटो पाहिले की आजही येतो अंगावर काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगरात पडलेला पाऊस

कुलाबा- २२३.२ मिलिमीटर
सांताक्रूझ – १४५.१ मिलिमीटर
बांद्रा – १०६.० मिलिमीटर
राम मंदिर – १६१.० मिलिमीटर
चेंबूर- ८६.५ मिलिमीटर
भायखळा- ११९.० मिलिमीटर
सीएसएमटी – १५३.५ मिलिमीटर
सायन – ११२.० मिलिमीटर