सातारा : वीर, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांसाठी सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.कण्हेर (ता. सातारा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस व धरणामध्ये येणारी पाण्याची आवक वाढती आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) दुपारपासून सांडव्यावरून नदी पात्रात चार हजार क्युसेक्स तर विद्युत गृहातून ५०० क्युसेक्स असे एकूण ४ हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वेण्णा नदीवरील हमदाबाज किडगाव व करंजे म्हसवे (ता. सातारा) पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उरमोडी (ता. सातारा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील कास (ता. जावली) तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. त्यामुळे आज मंगळवार दुपारपासून जलविद्युत प्रकल्पातून नदी पात्रात ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.
वीर (ता. पुरंदर ) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज (दि. २४) दुपारी धरणाद्वारे १ हजार ५०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे १३ हजार ९११ क्युसेक्स असा एकूण १५ हजार ४११ क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात येत आहे.धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा, उरमोडी व नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा व कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, फलटण यांनी केले आहे.