पंढरपूर : दिल्लीत सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत अहिल्यादेवींची देशभर जयंती साजरी होत आहे. याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल, असे तोंडभरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
येथील विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माउली हळणवर, सुभाष म्हस्के आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून राष्ट्रपती, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. यावेळेस संघाने देशभर जयंती साजरी करत असताना, देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये मराठा सरदारांनी मोठा दबदबा निर्माण केला. त्यामध्ये मल्हारराव होळकरांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती. हा इतिहास सर्वश्रुत आहे. अशा दिल्लीत अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व्हावे. तसेच देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक होण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याचेही पडळकर यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाच्या योजनांत निधी मिळत नाहीत. अजित पवार हे निधी अडवत आहेत. ही बाब खरी आहे. मात्र, सध्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा विषय आहे. याबाबत जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहून देणार आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.