सावंतवाडी: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. श्री नाईक म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी माझ्या वर टीका करताना आपण जिल्ह्यासाठी काय केले हे सांगायला विसरले.सर्वसामान्य लोक माझ्या पाठिशी असल्यामुळे कोणतीही शक्ती आली तरी माझा पराभव करू शकत नाही.

ठाकरे शिवसेनेच्या पहिल्याच यादीत कुडाळ मधून उमेदवारी जाहीर झाली आणि आमदार वैभव नाईक यांनी लगेचच आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यासाठी कुडाळ मालवण मतदार संघातून गावागावातून कार्यकर्ते, सामान्य नागरिक दाखल झाले होते. अंनत मुक्ताई समोरच्या मैदानावर जाहीर सभा झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल पथक, डीजेवर लागणारी जोशपूर्ण गीत यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण झाल्याचं पाहायला मिळाले. उघड्या गाडीवर उभे राहून मतदारांना अभिवादन करत आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कूच केली. कुडाळ येथे उमेदवारी अर्ज भरताना आमदार वैभव नाईक यांच्यासह परशुराम उपरकर, अमित सामंत, अभय शिरसाट हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.

हेही वाचा : Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री नाईक म्हणाले, आज अर्ज भरताना आम्ही कोणाला बोलावलं नव्हते. लोक उत्स्फूर्तपणे आली. उलट काल मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशावेळी नारायण राणेंना लोकांना जाऊ नका थांबा, असे आवाहन करावे लागत होते. हाच महाविकास आघाडी आणि महायुतीतील फरक आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे. कारण माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे. कालच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात बोलून गेले पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काय केलं हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा भ्रष्टाचारात कोणाला अटक केली. कोण गुन्हेगार आहेत ,याविषयी ते काही बोलले नाहीत. परंतु सामान्य लोक पाठीशी असले कि कुठल्याही शक्तीचा पराभव होऊ शकतो हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल.