पंढरपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून, ९१ महसुली मंडळांपैकी ४३ महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. तसेच उजनी व सीना नदीमधून पाणी सोडल्याने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, घरांचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने तसेच ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, यांच्यासह प्रांताधिकारी व सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. प्रशासकीय यंत्रणेने त्वरित पंचनामे करावेत. एकही शेतकरी व नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच पंचनामे करत असताना शेतकऱ्यांची पुन्हा ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही, यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी तसेच अन्य शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे ई- केवायसी झालेली आहे. त्याच बँक खात्यावर शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अधिनस्त रस्त्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असेही त्यांनी सुचित केले.

सोलापूर शहरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. तसेच शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी जाऊन जे नुकसान झाले, तशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही या दृष्टीने सर्व कारणांचा सविस्तर शोध घ्यावा व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात, असेही निर्देश पालकमंत्री गोरे यांनी महापालिका यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या पंचनाम्याची माहिती दिली.

थेट बांधावर संवाद

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या करमाळा, माढा, अक्कलकोट येथील गावातील नुकसानीची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी केली. थेट बांधावर जाऊन माहिती घेतली. सरकार तुमच्या पाठीशी आहे. तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.