परभणी : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पावसाळ्याप्रमाणे बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपल्यानंतर सततच्या पावसाने मातीतली ओलही वाढली होती. तथापि आजपासून कडक ऊन पडायला प्रारंभ झाला आहे. दरम्यान पुढील काही दिवसात तापमान सरासरीपेक्षा वाढलेले राहील असा अंदाज हवामान विभागाने दिल्याने त्याचा पेरण्यांवर परिणाम होणार असून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये याचा पुनरुच्चार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
दरवर्षी मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो. त्याआधी दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस होतो मात्र वर्षानुवर्षाचे चित्र यंदा बदलले. गेल्या दहा पंधरा वर्षात झाला नाही असा पाऊस यंदा मे महिन्यात झाला. दररोजच पावसाळ्याप्रमाणे पावसाने हजेरी लावली. जमिनीतली ओल वाढल्याने आता हळूहळू पेरण्यांना प्रारंभ करावा लागेल असे वाटत असतानाच आता पावसाने उघडीप घेतली आहे. अद्यापही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेले असले तरी आजपासून उन्हाची तीव्रता पुन्हा जाणवायला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे यापुढे मातीतली ओल कमी होणार आहे. यावर्षी पेरण्या लवकर सुरू होतील असे वाटत असतानाच आता अचानक वातावरणात बदल झाला आहे.
येत्या गुरुवारपर्यंत (दि.५) तापमान दोन ते तीन अंशाने वाढलेले असेल. त्याचवेळी दिनांक १२ जूनपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. तुरळक स्वरूपाचाच पाऊस होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. या आठवड्यासह पुढील आठवड्यातही पाऊस कमी होणार असल्याने पेरणीची घाई करू नये असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने आता जमिनीत ओल राहील व लगेचच मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज खोटा ठरवणारे वातावरण आजपासून बदलले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात तब्बल १३१ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून सेलू तालुक्यात तर तब्बल १८५ मिलिमीटर मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात ०.९०५ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. त्यामुळे या जलाशयात ५०.५६ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी जलसाठे भरले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांसह बी- बियाण्याची खरेदी केली. काही दिवसांतच पेरण्यांना प्रारंभ होईल असे वाटत असतानाच आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने पेरण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.