वाई : हो, मी हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो. हेलिकॉप्टरमधून जाऊन छायाचित्रण करण्यापेक्षा शेतीत गेलेलं चांगलं. शेतीत कोणतंही राजकीय प्रदूषण नाही. शेतीसमोर ग्लोबल वार्मिंगचं मोठं आव्हान आहे. राजकीय आव्हानं आम्ही सहज परतवू शकतो. मात्र पर्यावरणाचं आव्हान पेलता येत नाही, म्हणून पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांना आणखी विकसित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचगणी येथे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या षष्टब्दीनिमित्त भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय प्री वर्ल्ड महापॅराग्लायडिंग स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात व 'स्ट्रॉबेरी विथ सीएम' या कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजेश कोचरेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई व आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. हेही वाचा : “हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार”, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री म्हणाले, हेलिकॉप्टर मधून येऊन शेती करायला मी स्वतः स्ट्रॉबेरी पिकवतो. मी गावात शेतीत जातो. शेतकऱ्यांशी संवाद साधतो. त्यांचे प्रश्न समजून शासकीय योजनांची अंमलबजावणी करतो. लोकांमध्ये जाणं हा माझा छंद आहे. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी मला मुख्यमंत्री पदाचा कोणताही वास लागलेला नाही. मी मातीतील माणूस आहे आणि मी गावाकडे आल्यानंतर मुंबईचे सर्व राजकारण वगैरे विसरून गावातील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी, प्रशासनाशी संवाद साधतो आणि समोरासमोर बसून लोकांचे प्रश्न सोडवतो. मी घरी बसून फेसबूक लाईव्हवर काम करणारा माणूस नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. हेही वाचा : “नेते, उद्योगपतींनंतर आता ईडी व्यापाऱ्यांना छळणार, सावध व्हा”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा; म्हणाले… मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, शेतीमध्ये कोणतेही राजकीय प्रदूषण नाही. महाबळेश्वर आणि साताऱ्याची स्ट्रॉबेरी राज्यभरात प्रसिद्ध आहे. साताऱ्यात पावणे पाच हजार शेतकरी स्ट्रॉबेरी पिक घेतात. सरासरी शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतीमध्ये या पिकातून होते. मात्र ग्लोबल वार्मिंगचा व हवामानातील बदलांचा मोठा परिणाम या पिकावर होतो आणि वन्य प्राण्यांच्या घुसखोरीमुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांना या पिकावर अनुदान देण्याबाबत निर्णय घेणार आहे. शेती करताना मी अनुदान घेणार नाही, पण शेतकऱ्यांना मिळवून देणार आहे. स्ट्रॉबेरी पिकावर प्रक्रिया उद्योग या परिसरात उभारण्याबाबत माझी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. याबाबतही निश्चित तोडगा काढला जाईल. हेही वाचा : “मुलींना मोफत शिक्षण, स्थानिक पातळीवर निवडणुका स्वतंत्र होतील”, अजित पवार यांचे सूतोवाच सातारा जिल्ह्यात साडेसहा हजार एकर बांबू शेती करण्यात येत आहे. वासोटा किल्यासह महाबळेश्वर, पाचगणी, जावली, वाई परिसरातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेकदा शेतीच्या प्रश्नांवर उत्तर देताना राजकीय कोट्या केल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. निर्यात बंदी असल्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत होते . मात्र आज दुपारी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी येथे सांगितले.