वाई: भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केलेली असताना व उदयनराजे भोसलेच साताऱ्यातून लोकसभा लढणार असे आता निश्चित झालेले असताना लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आयत्यावेळी अजित पवारांनीही नकार दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा खूप मोठा परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर झाला आहे. अशातच लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नेतृत्वाकडून तळ्यात मळ्यात अशी दुहेरी भूमिका घेतली जात आहे. यामुळे आमदार, प्रमुख कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नेतृत्वाकडून स्पष्ट संकेत मिळत नाहीत त्यामुळे सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असताना, तळागाळात मतदार व जनसंपर्क असताना, सर्वात जास्त संस्था आपल्या ताब्यात असताना, महायुतीत सामील झाल्याने आमदारांपासून प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपापुढे बोटचेपी भूमिका घ्यावी लागत आहे. भाजपा साताऱ्यात निवडणूक तयारी व जनसंपर्क वाढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा उठविण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. अशातच लोकसभा मतदारसंघ सोडल्यास पक्षाच्या जिल्ह्यातील राजकारणावर त्याचा खूप मोठा परिणाम होईल ही भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : तुकोबांचा अभंग वाचत अमोल मिटकरींचं विजय शिवतारेंना उत्तर, “विंचवाची नांगी तैसा दुर्जन..”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि पक्ष चिन्ह आपल्या गटाला मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार आपला गट प्रबळ करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात आक्रमक गट बांधणी सुरु केली आहे. अगोदरच माढा लोकसभेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर इच्छुक असताना त्या ठिकाणी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे फलटण खटाव माण कोरेगाव सातारा येथील रामराजेंचे राजकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे.

साताऱ्याची ही जागा भाजपला सोडल्यास जिल्ह्यातील राजकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होईल. यावेळी भाजप महायुतीमध्येच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष निर्माण होईल. अशातच लोकसभा मतदारसंघ सोडल्यास पक्षाच्या जिल्ह्यातील राजकारणावर त्याचा खूप मोठा परिणाम होईल ही भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसा निरोप जिल्ह्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. सातारा हा अजित पवार यांचाही बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी दबाव वाढवल्यामुळे साताऱ्याच्या जागेवरून महायुतीमध्ये व अजित पवारांकडून तानाताणी सुरू आहे. साताऱ्याच्या जागेवरून आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. या जागेवरून आम्ही मागे हटणार नाही, ही जागा राष्ट्रवादीचीच आहे, असा दावा अजित पवार यांच्याकडे करण्यात आला आहे. येथून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी ही अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. मकरंद व नितीन पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील साताऱ्याच्या राजकारणाचे भीष्माचार्य होते. तसेच नितीन पाटील हे साताऱ्याच्या धोरणात्मक राजकारणातील एक बिनीचे जाणकार, अंतर्गत राजकारणातील प्रबळ नेतृत्व आहे . त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची मागणी होत आहे. त्यांनाच अथवा त्यांच्याशिवाय कोणालाही उमेदवारी द्या परंतु साताऱ्याची जागा सोडू नका असा निरोप पक्ष कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

हेही वाचा : “विजय शिवतारे बारामतीमधून लढू शकतात, पण…”, शिंदे गटाच्या भूमिकेमुळे गोंधळात भर

त्यामुळे साताराच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. अजित पवार पहिल्यापासून साताऱ्यासाठी आग्रही आहेत. महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ज्यांचा विद्यमान खासदार त्यांनाच मतदारसंघ सोडण्यास प्राधान्य असे सूत्र आहे. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यावर आपलेच प्रभुत्व रहावे यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत . त्यामुळे अंतिम बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही साताऱ्याची जागा सोडण्यास नकार दिला आहे. उदयनराजेंनाच घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवा मात्र जागा सोडू नका अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्याने आता अंतिम निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

खासदार उदयनराजे यांनी मात्र मला माझ्याकडे सगळी तिकिटे आहेत. मला तिकीट मिळो अथवा न मिळो मी राजकारणातून संन्यास काही घेणार नाही, असे सांगून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत पूर्वीच दिले आहेत. त्यामुळे अजित दादा आणि उदयनराजे आता काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागले आहे.