सावंतवाडी: गेल्या दोन दशकांपूर्वी पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आंबोली आता पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे पर्यटकांना आकर्षित करण्यात कमी पडत आहे. एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण असली तरी, सोयीसुविधांच्या अभावामुळे थंड हवेचे ठिकाण असूनही पर्यटक आंबोलीकडे पाठ फिरवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.
दक्षिण कोकणातील प्रति महाबळेश्वर म्हणून ओळख असूनही, आंबोलीत पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे. सध्या उष्णतेची लाट असताना थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची वाढती मागणी असते. मात्र, प्रशासन आणि वन विभागाच्या उदासिनतेमुळे आंबोलीत पर्यटकांची संख्या घटत चालली आहे.
पावसाळ्यात आंबोलीची ओळख धबधबे आणि दाट धुक्यामुळे पर्यटकांना भुरळ घालते. मात्र, या पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते अनेक वर्षांपासून दुरुस्त न केल्याने पर्यटकांनी आता या ठिकाणाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात उष्णता वाढत आहे आणि शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पर्यटक थंड हवेची ठिकाणे शोधतात. आंबोली, चौकुळ आणि गेळे या परिसरात नैसर्गिक सौंदर्य आणि गारवा असल्याने पर्यटक येऊ शकतात. परंतु, प्रशासनाकडून केवळ निधी खर्च करण्यावर भर दिला जात असल्याने पर्यटनाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
आंबोलीत निवास आणि भोजनासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाने आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील पर्यटनासाठी कोणतीही ठोस योजना आखलेली दिसत नाही. आंबोलीतील हिरण्यकेशी देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. मात्र, या देवस्थानाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब आहे. एकाच वेळी एक वाहन जाऊ शकेल अशा अरुंद रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहनचालकही त्रस्त झाले आहेत.
वन विभागाच्या देखरेखेखाली असलेले बालोद्यान आणि फुलपाखरू उद्यानही दुर्लक्षित अवस्थेत आहेत. बालोद्यानाची योग्य देखभाल न केल्यामुळे त्याची रया गेली आहे. आंबोलीतील विविध पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते खराब असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. वन विभागाच्या बालोद्यानात तर प्रचंड हेळसांड दिसून येत आहे आणि वनक्षेत्रपालांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. या उद्यानातील कृत्रिम वाघाची गुहाही मोडकळीस आली आहे.
सिंधू रत्न योजनेअंतर्गत आंबोली पर्यटन स्थळांसाठी दोन पर्यटक वाहने देण्यात आली आहेत, परंतु ती केवळ पावसाळ्यातच उपलब्ध असतात आणि उन्हाळ्यात धूळ खात उभी राहतात. ही वाहने आंबोली वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात आहेत.
आंबोली पावसाळी हंगामापुरते पर्यटन?
निसर्ग पर्यटन अभ्यासक काका भिसे यांनी सांगितले की, “वीस वर्षांपूर्वी आंबोलीत वर्षभर पर्यटकांची गर्दी असायची. आता हे पर्यटन केवळ पावसाळ्यापुरते आणि तेही धांगडधिंगा घालणाऱ्यांसाठीच आहे की काय, असा प्रश्न पडतो. पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते दहा ते पंधरा वर्षांपासून दुरुस्त केलेले नाहीत. निसर्गाची येथे भरभरून देणगी आहे, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळायला हवी, पण त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आंबोली थंड हवेचे ठिकाण असल्याने शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे पर्यटन स्थळांचा विकास आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्यास येथे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची गर्दी होईल. यासाठी आंबोलीतील जागरूक नागरिक आणि निसर्गप्रेमींना विश्वासात घेणे आवश्यक आहे.”
या गंभीर परिस्थितीकडे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा दक्षिण कोकणातील हे सुंदर ठिकाण केवळ भूतकाळातील एक रम्य आठवण बनून राहील.