सोलापूर : शाळेच्या निमित्ताने बाल निरीक्षण गृहाबाहेर गेलेल्या पाच मुलांना अज्ञात व्यक्तींनी कशाचे तरी आमीष दाखवून त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लष्कर-उत्तर सदर बझार भागात १९३२ सालापासून कार्यरत असलेले ‘जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना अभिक्षण गृह’ म्हणजेच बाल निरीक्षणगृह (रिमांड होम) हे येथे राहणाऱ्या मुलांचे जणू मायेचे संकुल मानले जाते. या बाल निरीक्षण गृहातून मुले पळूनही जातात. ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी पाच मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा : सांगली : औदुंबरमध्ये मिनीबस आगीत खाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाल निरीक्षणगृहातील मुले सोलापूर महानगरपालिका लष्कर शाळेत (क्र. १) शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे ही मुले सकाळी शाळेत गेली. परंतु नंतर बाल निरीक्षण गृहात परतली नाहीत. त्यांना अज्ञात व्यक्तींनी कशाचे तरी आमीष दाखवून फूस लावून बाल निरीक्षण गृहाच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची फिर्याद तेथील सुरक्षा रक्षक विजयकुमार मधुकर शिंदे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली. कार्तिक सयाजी पाटील (वय-१६), तुषार महेश (वय १६, पूर्ण नाव नाही), अजय शरणप्पा झुरळे (वय-१५), अर्जुन ( पूर्ण नाव नाही, वय-१३ ) आणि ऋतिक चंद्रकांत चौगुले (वय-१२) अशी त्या मुलांची नावे आहेत.