देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पाचही राज्यांमध्ये निवडणुकीची धामधुम सुरू आहे. विद्यमान सत्ताधारी पक्ष आपल्या योजनांचा प्रचार करत आहेत. तर विरोधक या योजना कशा कुचकामी आणि भ्रष्ट आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं सरकार आल्यावर तरुणांना रोजगार देऊ, रोजगारासाठी काय काय केलं जाईल, याबाबतची वेगवेगळी आश्वासनं सर्वच पक्षांकडून दिली जात आहेत. तसेच राज्या-राज्यांमधल्या बेरोजगारीरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार सातत्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली असल्याचा दावा करत आहे. तर दुसऱ्या बाजूला देशातल्या वाढत्या बेरोजगारीवरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील वाढत्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी एका सर्वेक्षणाचा दाखला देत मोदी सरकारला टोला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पाटील यांनी म्हटलं आहे की, एकीकडे देशात वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, सत्ताधारी पक्षाचे नेते प्रचारात आकंठ बुडाले आहेत, दुसरीकडे भारतातील बेरोजगारी शिगेला पोहोचली असून देशातील तरुण बेरोजगारीच्या नैराश्यात आकंठ बुडाले आहेत. सेंटर फॉर मॉनिटरींग इकोनॉमीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशातील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे १०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
हे ही वाचा >> घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? प्रकाश सोळंके म्हणाले, “पोलिसांनी…”
जयंत पाटील म्हणाले, एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे बेरोजगारी देखील वाढत आहे. हे चित्र विरोधाभासी आहे. बेरोजगारी वाढत असल्याने देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा ठरत आहे.