पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबारमध्ये महायुतीच्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे. “त्यांना तुमच्याबरोबर यायचं असतं तर कधीच आले असते, त्यांना अजित पवारांची काय गरज?”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“मला मोदींचे दोन शब्द सर्वात जास्त खटकले. शरद पवार हे हताश आणि निराश कधी होत नाहीत. ८४ वर्षांचा योद्धा हताश आणि निराश कधीच होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने आणि अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. शरद पवार यांनी जे दौरे केलेत ते पाहता त्यांना हाताश आहेत, असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही. शरद पवारांचे त्यांच्या विचारधारेवर खूप प्रेम आहे. हा देश धर्मनिरपेक्ष राहीला आणि देशाचे संविधान सुरक्षित राहिले तर हा देश एक राहिल, असं त्यांचं मत आहे. काँग्रेस ही गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा : मतदानाला दोन दिवस बाकी असताना डॉ. अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक…’

अजित पवारांची काय गरज?

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “ज्या विचारधारेसाठी शरद पवार यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं. त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजित पवारांची काय गरज? ते थेट तुमच्याकडे आले असते. मात्र, मोदींनी केलेले हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले आहे. तुम्ही एका जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करता हे संपूर्ण भारताने पाहिले आहे. या पक्षाचे मालक शरद पवार आहेत. जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेला आहे”, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी काही लोकांबरोबर काही विचार विनिमय करून ते विधान केले असावे. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की,नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे मोदी यांनी म्हटले होते.