कर्जत: तालुक्यातील चिंचोली गावठाण, मोरे वस्ती, खंडाळा या गावांना जोडणाऱ्या गोयकरवाडी भागाचा जुना रस्ता प्रलंबित असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, गरोदर माता, वृद्धांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. सापांच्या वावरामुळे या पाण्यातून प्रवास ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्ता वेड्या बाभळींनी वेढलेला आहे. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तलाठी व मंडलाधिकारी आले असता स्थानिकांनी विरोध करत, वाद घालून काम थांबवले. आजपर्यंत महसूल प्रशासनाला हा रस्ता खुला करता आलेला नाही.
या रस्त्याचा वापर विद्यार्थी, महिला, वृद्ध व्यक्ती रोज करतात. पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते. त्यातून वाटचाल जीवघेणी ठरते. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे वेड्या बाभळींची वाढ झालेली आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. दुर्घटनाही घडल्या आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांची शाळा बुडते. अन्यथा त्यांना पाण्यातून जावे लागते. रात्रीच्या वेळीही वाटचाल जोखमीची ठरते. ग्रामस्थांनी महसूल प्रशासन, ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. मात्र, दखल घेतली गेली नाही. रस्ता लवकर खुला केला नाही, तर तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे. या रस्त्यावर पूर्वी पाणी नैसर्गिक वाहून जात होते, तशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आम्हाला शाळेत जायचंय
आम्हाला शाळेत जायचंय; पण रस्ता नसल्यामुळे आमची शाळा बुडते. मग आम्ही अधिकारी कसे होणार, आमचा रस्ता तत्काळ खुला करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.