सांगली : केंद्र शासनाने बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत वस्त्रद्योगाला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितलेे.

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने १७ मे रोजी एका अधिसूचनेद्वारा बांगलादेशातून भारतात व भारत मार्गे इतर देशात होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध जारी केले आहेत. आतापर्यंत बांगलादेशातून आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम व पश्चिम बंगाल या सीमावर्ती भागातील जमिनी मार्गाने मोठ्या प्रमाणावर आयात होत असलेल्या ११ भू-सीमा चौक्या आयातीसाठी बंद करण्यात आल्या असून केवळ कोलकाता व न्हावा शेवा-मुंबई या दोनच बंदराच्या माध्यमातून सागरी मार्गाद्वारे आयातीस परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशातून भारतात होत असलेल्या वस्त्रउत्पादनांच्या एकूण निर्यातीपैकी ९३ टक्के निर्यात प्रतिबंधित होत असून जमिनी मार्गाने कमी वाहतूक खर्चात व जलद गतीने भारतात होत असलेली आयात नियंत्रित होणार असल्याचा फायदा भारतातील वस्त्रोद्योगास होणार आहे. त्यामुळे देशातील वस्त्रोद्योग संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिकीकरणानंतरच्या नियमांमुळे बांगलादेशास मुक्त व्यापार कराराअंतर्गत शून्य टक्के निर्यात कराने माल भारतात पाठविण्याची मुभा मिळाली होती. बांगलादेशाची वस्त्रउत्पादनांची क्षमता फारशी मोठी नसल्याने भारतातील वस्त्रोद्योगास सुरुवातीला याचा फार तोटा वाटला नाही. मात्र चीनमधून गैरफायदा घेत आपली वस्त्रउत्पादने बांगलादेशाच्या माध्यमातून भारतात निर्यात करू लागल्याने याचा फटका देशातील वस्त्रद्योगाला बसत होता.भारताने घातलेले निर्बंध स्वागतार्ह आहेत. हे निर्बंध तात्पुरते न राहता कायमस्वरूपी राहिले तरच भारतीय वस्त्रोद्योगास याचा फायदा होणार आहे, असे तारळेकर यांनी म्हटले आहे.