लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये लोकसभेच्या काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर झाले आहेत, तेथे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी प्रचारासाठी आणि उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, यासंदर्भात रणनीती ठरवली जात आहे. आता कोल्हापूरमध्ये उमेदवाराला विजयी करण्यासाठी चक्क ‘मिसळ पे चर्चा’ करत पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांना वियजी करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून ‘मिसळ पे चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी, निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करावा तसेच उमेदवाराचा विजय होण्याच्या दृष्टीने रणनीती काय असावी? यासह आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हेही वाचा : ‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
राजेश क्षीरसागर काय म्हणाले?
“कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी आज महायुतीची बैठक पार पडली. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा विश्वास आहे. मात्र, त्यासाठी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबविण्यात यावी, यासाठी ही बैठक होती. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा मोठा विकास केला आहे. देशातील जनतेला अपेक्षित असे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे आता मतदारही मतदान करण्यासाठी तयार आहेत. आम्हाला खात्री आहे की, आमचा अबकी बार ४०० पारचा दिलेला हा नारा नक्की पूर्ण होईल. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे वियजी झालेले दिसतील”, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.