सावंतवाडी : कोकणात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू आणि कोकम या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काजू उत्पादकांना कोट्यवधींचा फटका
काजूचा हंगाम अजून संपायचा होता, परंतु अवकाळी पावसाने पाले काजूचे (नवीन पालवीसोबत येणारे काजू) मोठे नुकसान केले आहे. एकूण काजू उत्पादनापैकी १२ ते १५ टक्क्यांहून अधिक वाटा पाले काजूचा असतो. हे काजू अत्यंत चविष्ट असतात आणि हंगामाच्या शेवटी येत असल्याने त्यांना चांगला भावही मिळतो. यावर्षी पाले काजू वाया गेल्याने काजू बागायतदारांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हापूस आंब्याचे २० टक्के उत्पादन वाया
हापूस आंब्याचा हंगाम आता संपत आला होता, परंतु अजूनही २० टक्के आंबा काढणीसाठी शिल्लक होता. कॅनिंगचा हंगाम जोमात असतानाच आलेल्या या पावसामुळे रत्ना, सिंधू, गोवा माणकूर, पायरी, करेल यांसारख्या मे महिन्याच्या शेवटी तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा अक्षरशः सर्व आंबा कुजून गेला आहे.
कोकम हंगामालाही अवकाळीचा फटका
कोकमचा हंगाम साधारणपणे ५-६ मे नंतर सुरू होऊन ८-१० जूनपर्यंत चालतो. यावर्षी कोकम उशिरा पिकायला सुरुवात झाली होती आणि पिकायला लागल्यावरच अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे सर्व कोकम वाया गेला आहे. याचा परिणाम प्रक्रिया उद्योगांवर आणि त्यावर आधारित गृह उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
स्थानिक लोकांना मिळणारा उत्तम दर्जाचा आमसूल यावर्षी तयार होणार नाही, तसेच कोकम आगळ आणि कोकम सरबत बनवणाऱ्या उद्योजकांचेही मोठे नुकसान होणार आहे. तसेच जांभूळ पीक धोक्यात सापडले आहे. गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यंदा किरकोळ स्वरूपात जांभूळ पीक मिळाले,पण जांभूळ सरबत तयार करण्यासाठी जांभूळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. जांभूळ मधुमेही रुग्णांना उपयुक्त मानले जाते. त्यात औषधी गुणधर्म आहेत.
या अस्मानी संकटामुळे कोकणातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या मदतीची त्यांना नितांत गरज आहे.