अलिबाग : निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि मनमोहक समुद्रकिनारे लाभलेल्या अलिबागची भुरळ आता पर्यटकांबरोबरच बॉलीवूड तारे-तारका, बडे उद्याोजक, क्रिकेटपटू यांसह अनेक धनाढ्य व्यक्तींना पडत आहे. त्यामुळेच पर्यटनाबरोबर अलिबाग गुंतवणुकीचेही केंद्र बनले असून देशी-विदेशी बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडून अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केली जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या शहरातील जमिनींचे भाव दुपटीने वाढले आहेत.

मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेले अलिबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण. साप्ताहिक सुट्टी साजरी करण्यासाठी बहुतेक मुंबई-ठाणेकर अलिबाग गाठतात आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अलिबागमधील गजबजाट वाढलेला आहे. त्याशिवाय या परिसरात पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्याने होत आहे. जवळपास १०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांमुळे अलिबाग आणि त्याभोवतीच्या तालुक्यांचा विकास होत असून अलिबाग परिसर गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी आले आहे.

अनेक तारांकित व्यक्तींनी अलिबागमध्ये घरे, बंगले खरेदी केली आहेत. त्यामुळे महसुलात वाढ झाली. २०२२-२३ मध्ये अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात ५, ७०८ दस्तांची नोंद झाली. यातून १३२ कोटी मुद्रांक शुल्क आणि ७ कोटी २६ लाख नोंदणी शुल्क जमा झाले. २०२३-२४ मध्ये अलिबाग परिसरात ६,४८२ दस्तांची नोंद झाली. ज्यातून २१६ कोटी मुद्रांक आणि ८ कोटी ३३ लाख नोंदणी शुल्क जमा झाले. गेली तीन वर्ष रेडिरेकनरचे दर स्थिर आहेत. मात्र तरीही मुद्रांक शुल्कातून येणाऱ्या महसुलात दुपटीने वाढ झाली आहे. यावरून या परिसरात जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा अंदाज येऊ शकतो.

आलिशान बंगले प्रकल्पांची मालिका

दुबईतील बुर्ज खलीफा इमारत बांधणाऱ्या एम्मार कंपनीने अलिबागमध्ये कासा वेनेरो हा ८० बंगल्यांचा प्रकल्प सुरू केला आहे. लोढा समुहाने ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’, ‘भास्करनवॉटर फ्रँन्ट’ ही सोळा मजली इमारत आदी प्रकल्प सुरू केले. हिरानंदानी सँण्ड्स आणि महिंद्रा मेरिडियन ओबेरॉय रिएलिटीने ८१ एकर जागा अलिबाग तालुक्यातील टेकाळी परिसरात खरेदी केली आहे, ज्यात १५० हून अधिक आलिशान बंगल्यांच्या उभारणी केली जाणार आहे.

जागा, जमिनी आणि घरांच्या किमतीत वाढ

मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अलिबाग परीसरातील जागांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शेत जमिनींचे दर १५ ते २० लाखांपर्यंत, तर बिनशेती जागा २० ते २५ लाख रुपये गुंठ्यापर्यंत (१००० चौरस फूट) विकली जात आहे. बांधलेल्या घरांच्या किमतीतही वाढ झाली आहे. अलिबाग शहरालगत ५००० ते ७००० चौरस फूट दराने विक्री होत आहे.

पायाभूत सुविधांचा विकास

तीन हजार कोटी रुपयांच्या रेवस करंजा पूलाचे काम लवकरच सुरू होत आहे. या पुलामुळे मुंबई ते अलिबाग अंतर तीन तासांवरून अवघ्या एक तासावर येणार आहे.

नवी मुंबई विमानतळ या वर्षापासून सुरू होत आहे. या विमानतळावर अलिबागवरून ५० मिनटांत पोहोचता येणार आहे.

एमएमआरडीएच्या अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिकेचे कामाला या वर्षापासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

राज्य सरकारने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या ग्रीन फिल्ड द्रुतगती मार्गाची घोषणा केली आहे. हा महामार्ग अलिबागमार्गेच जाणार आहे.

रेवस रेड्डी सागरी मार्गाच्या उर्वरीत कामाला सुरुवात झाली आहे. अलिबाग हा या मार्गाचा अविभाज्य भाग आहे.जवळपास १०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे अलिबाग व त्याभोवतींच्या तालुक्यांचा विकास.

रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड विभागाचा ‘एमएमआर’मध्ये झाल्यापासून दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले. अलिबाग परिसरात विकेंण्ड होम खरेदी, शेतघर आणि जागा खरेदींचे प्रमाण वाढले आहे. करोना काळानंतर येथील जमिनींच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे.- श्रीकांत सोनवणे, मुद्रांक जिल्हाधिकारी, रायगड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिबाग परिसरात पूर्वी बांधकामांवर बरेच निर्बंध होते. मात्र यूडीसीपीआर लागू झाल्यापासून सरसकट एफएसआय मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशभरातील आणि परदेशातील बांधकाम विकासक या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. रो रो सेवेमुळे मुंबईचे अंतर आणखी कमी झाले. त्यामुळे सेलिब्रिटी आणि उद्याोजकांचा या परिसरात घर बांधण्याकडे कल वाढला.- प्रसाद जोग, बांधकाम व्यवसायिक