सावंतवाडी: तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मळेवाड येथील प्रभाकर राऊळ, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर आणि आनंद न्हावी हे चार शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मळेवाड प्राथमिक उपकेंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उप वनसंरक्षक मिलीश शर्मा, वनविभाग कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा आणि मांजराला भक्ष करण्यासाठी बिबट्या आला होता. मुळीक यांना घराच्या मागच्या बाजूला चाहूल लागल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता बिबट्या त्यांच्यासमोरच दिसला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत पंजाने डोक्याला गंभीर दुखापत केली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तिथून पळ काढला. जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
याच दरम्यान, देऊळवाडी येथील सूर्यकांत सावंत यांच्यावरही बिबट्याने हल्ला करत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवले. या प्रयत्नात पंढरी आजगावकर आणि आनंद न्हावी हे दोन ग्रामस्थही बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले.
दिवसाढवळ्या भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. श्री. मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचल्याने बिबट्याला पाण्यातून बाहेर जाणे कठीण आहे. त्यामुळे तो बागेतच लपून बसला असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वनविभाग आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू आहे.