राहाता: अवघ्या ९ दिवसांपूर्वी कोल्हार बुद्रुक येथे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी चार बिबटे जेरबंद झाल्याची घटना तसेच दोन दिवसांपूर्वी दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल, शुक्रवारी रात्री कोल्हार बुद्रुक येथे निबे वस्तीजवळ पाचवा बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. मात्र, पिंजऱ्याच्या तळाला असलेले प्लायवूड तोडून बिबट्याने पलायन केले. ही घटना आज, शनिवारी वनविभाग व शेतकऱ्यांच्या लक्षात आली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा याच ठिकाणी नवीन पिंजरा लावण्यात आला आहे.

कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर गावासाठी नवीन साठवण तलावाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. याच भागात गेल्या सव्वा महिन्याच्या कालावधीत एकापाठोपाठ एक बिबटे पिंजऱ्यात अडकत आहेत. एका पाठोपाठ तब्बल ५ बिबटे आत्तापर्यंत या एकाच ठिकाणी जेरबंद झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आठ दिवसांपूर्वी याच भागात पिंजरा लावला होता. पावसामुळे शेतात पाणी साचले होते. या पाण्यामुळे पिंजऱ्याच्या खालील भागात असलेले प्लायवूड पाण्याने भिजल्याने ते फुगले होते.

जेरबंद झालेल्या बिबट्याने प्लायवूड तोडून, जमीन उकरून पिंजऱ्याच्या खालून पलायन केल्याची माहिती वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी दिली. रात्री जेरबंद झालेल्या बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व शेतकरी आज सकाळी घटनास्थळी आले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या दिसून न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बिबट्याने पलायन केल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराब झालेल्या पिंजऱ्याच्या जागेवर नवीन पिंजरा लावण्यात आल्याचे वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा मादी जातीचा असून मोठ्या आकाराचा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. गेल्या सव्वा महिन्याच्या कालावधीत या एकाच ठिकाणी एकापाठोपाठ पिंजऱ्यात जेरबंद होणारा हा पाचवा बिबट्या होता. दोन दिवसांपूर्वी कोल्हार बुद्रुक येथे राजुरी रस्त्यालगत कापसे वस्तीवर दोन बिबट्यांच्या झुंजीमध्ये एक बिबट्या मृत्युमुखी पडला. एकाच जागेवर इतके बिबटे पकडले जाण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी. आणखी एक विशेष म्हणजे याच भागात अजूनही बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. वनविभागाच्या भोंगळ व हलगर्जीपणाबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.