सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे उभारणी होऊनही प्रत्यक्षात सुरू न होता, जन्मतः १२ वर्षे वनवास वाट्याला आलेल्या लोकशक्ती साखर कारखान्याचे धुराडे पेटण्याची आशा पल्लवित झाली आहे. उभारणीपासूनच अनेक आर्थिक अडचणी, नंतर न्यायालयीन लढाई अशा पेचात सापडलेल्या या कारखान्याचा ताबा कोल्हापूरच्या अथर्व ग्रुप कंपनीने घेऊन आगामी गाळप हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी हाती घेतली आहे.

तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी स्वतःचा मोहोळ तालुक्याचा इलाखा सोडून इकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे २०१३ साली लोकशक्ती साखर कारखान्याची उभारणी हाती घेतली होती. साडेतीन हजार मे. टन गाळप क्षमतेच्या या कारखान्याच्या उभारणीत सुरुवातीपासूनच आर्थिक अडचणींचा डोंगर उभारला होता. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असूनही त्याच पक्षाच्या ताब्यातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यात त्यांच्या हितसंबंधी विरोधकांनी आडकाठी आणली होती. पंजाब नॅशनल बँक व इतर काही बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातून कारखान्याची उभारणी कशीबशी झाली खरी; परंतु अडथळ्यांची शर्यत संपली नव्हती. कर्जवसुलीचा तगादा, मालमत्तेची जप्ती यामुळे कारखाना सुरू न होताच सांगाड्याच्या रूपात अस्तित्वात राहिला. स्वतः डोंगरे व त्यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (एनसीएलटी) गेले. यातून कारखाना लिलावात काढण्यात आला. यात अथर्व ग्रुप ऑफ कंपनीस (मानसिंग खोराटे, कोल्हापूर), ट्रेटी वन शुगर (अमित देशमुख, लातूर), मलसिध्द मुगळे (उद्योजक, दक्षिण सोलापूर) आणि दत्त शुगर (कर्नाटक) यांनी बोली लावली होती. यात धनको बँकांच्या अटी व शर्तीची पूर्तता करून अथर्व कंपनीकडे ‘लोकशक्ती’चा ताबा देण्यात आला. अथर्व कंपनीला कोल्हापूरच्या दौलत साखर कारखाना उभारणीचा अनुभव आहे. सध्या जीर्ण झालेल्या लोकशक्ती कारखान्याची देखभाल दुरुस्तीसह नवीन यंत्रसामग्री उभारून प्रत्यक्ष कारखाना सुरू करण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. परंतु कारखाना युद्ध पातळीवर उभारला जात असल्याचे कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष मानसिंग खराटे यांनी सांगितले. हा कारखाना सुरू झाल्यास दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर पट्ट्यात साखर कारखानदारांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.