गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. महामार्गावर पनवेल ते कशेडीदरम्यान वाहतुकीची कोंडी झाली नसल्याने चाकरमान्यांचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. माणगावजवळील अपघात वगळता महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळू लागतात. मिळेल त्या वाहनाने चाकरमानी कोकणात जायला निघतात. यामुळे गणेशोत्सवाच्या आधी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ होत असते. याच्या परिणामी महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पेण ते वडखळ, इंदापूर ते माणगाव, वाकण ते कोलाड या टप्प्यात हजारो वाहने तासनतास अडकून पडत असत. यावर्षी चाकरमान्यांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांत महामार्गावर पनवेल ते कशेडी घाट या पट्टय़ात कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही. शिवाय प्रचंड पावसामुळे खड्डय़ात गेलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यश आल्यानेही वाहतुकीतील मोठा अडसर दूर झाला आहे. माणगाव येथील एक अपघात वगळता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. माणगावजवळील गणेश हॉटेलजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. होन्डा गेट्झ ही गाडी झाडावर जाऊन आदळली. यात कळवा येथील दीपक उत्तेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. हे सर्व रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेड तालुक्यातील साखर येथे जात होते.
दरम्यान गणेशोस्तवाच्या पाश्र्वभूमीवर महामार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांचे अडीचशे, तर रायगड पोलिसांचे अडीचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. महामार्गावर पाच ठिकाणी मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली. तर इथे अ‍ॅम्ब्युलन्स आणि क्रेन्स तयार ठेवण्यात आल्या, तर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.