राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन लागू केला आहे. मात्र अशातही काहीजण नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे. लॉकडाउन आणि जिल्हाबंदी आदेश झुगारून सहलीसाठी येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करत ५५ हजारांचा दंड वसूल केला.
महाबळेश्वर पाचगणी या गिरीस्थानावर करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बंदी असतानाही मुंबई येथील पर्यटकांना महाबळेश्वरात येणे चांगलेच महागात पडले. या पर्यटकांवर आणि पर्यटकाला हॉटेल उपलब्ध करुन देणाऱ्याला पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कारवाई केली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी जाहीर केली आहे. सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे.
पुणे बंगळूर महामार्गावरून मुंबई पुण्यातून साताऱ्यात येण्यास नाकाबंदी केली आहे. परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. मुंबईच्या पर्यटकांनी टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल ली मेरिडियनमधील रूम ऑनलाइन बुक केल्या.
ठरल्याप्रमाणे पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्यावर आले असता त्यांनी हॉटेल आरक्षित असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला. पथकाने पर्यटकांची एक गाडी प्रवेशद्वारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार, तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनास २५ हजार रुपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने एकूण ५५ हजारांचा दंड वसूल केला.