सोलापूर : सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांवर खोटे आरोप करून आंदोलक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. यातून मराठा समाजात नाराजीची प्रचंड लाट वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा बोलू लागले आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. आता मीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असेही त्यांनी इशारावजा विधान केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात कोणीही मर्यादा सोडल्यास त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू, असे इशारावजा भाष्य केले होते. त्यावर बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

हेही वाचा – संजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का? चंद्रकांत पाटलांचा प्रश्न

जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात करमाळा, मोहोळ, बार्शी आदी भागात दौरे करून सभा घेतल्या. सर्व सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षण आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलीस आता आंदोलनाचे उभारलेले फलक काढत आहेत. यात पोलिसांना दोष देता येणार नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याच सांगण्यावरून मराठा आंदोलनाचे फलक काढले जात आहेत. फडणवीस यांच्या पोटात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे दुखू लागले आहे, असाही आरोप जरांगे यांनी केला.

आज सार्वजनिक जागेवरील फलक काढले जातील. पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक मराठा व्यक्तीने आपापल्या घराच्या दरवाजावर, कोणत्याही पुढाऱ्याने मते मागण्यासाठी आमच्या घरात येऊ नये, असे भित्तीपत्र डकवावेत, असेही आवाहन त्यांनी केले. घरावर डकवलेले भित्तीपत्र काढून टाकण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया… जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरांना पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण सहा महिने वाट पाहिली. मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याऐवजी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाच्या अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नाही. उलट करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी देण्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे हे बोलत असलेली भाषा देवेंद्र फडणवीसांची आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. मात्र मराठा समाजही आता प्रचंड नाराजीच्या लाटेत सरकारचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.