आष्टी गावात मराठा समाजाची मतं ही बोटांवर मोजण्याइतकी आहेत, असं विधान बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडीओसुद्धा वायरल झाला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या विधानावरून बबनराव लोणीकर यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे पाटील यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोणीकर यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लोणीकरांचे विधान खेदजनक आहे. या नेत्यांच्या अशा वागण्याने मराठा समाज अडचणीत यायला लागला आहे. अशा लोकांना मराठा समाजाने थारा देऊ नये. त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय ते जागेवर येणार नाही. त्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद केवळ मराठा समाजात आहे, त्यांना समाज नक्कीच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

व्हायरल व्हिडीओत लोणीकरांनी नेमकं काय म्हटलंय?

आष्टी गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची मतं बोटांवर मोजण्याइतकी आहेत. मात्र हे गाव सर्व समाजांचं गाव आहे. सगळ्या जाती-धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेंडे, कांबळे सगळे आहेत. असं या व्हिडीओत बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) म्हणताना दिसत आहेत. मात्र, मराठा मतं बोटांवर मोजण्याएवढीच आहेत, या विधानाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

हेही वाचा – Manoj Jarange Patil in Assembly Election : मनोज जरांगे यांच्या निर्णयाने उमेदवार नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बबनराव लोणीकर यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, या व्हिडीओनंतर बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या भाषणात मी म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावात कमी आहे. गाव एससी. एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लिम अशा अठरापगड जातींचं गाव आहे. ४० वर्षे या गावाने भाजपाला मताधिक्य दिलं आहे. मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मतं मला मिळतात. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे.” असं बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.