सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी झालेल्या भाजप सुकाणू समितीच्या बैठकीत केले.मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे-पाटील यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा घेत असताना सांगितले, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीत रहावे. या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वतंत्र लढायच्या याबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, देण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वानीच जातीने प्रयत्न करावेत. कोणत्याही स्थितीत गाफील न राहता अधिकाधिक जागा निवडून आल्या पाहिजेत यासाठी प्रभाग निहाय पक्ष संघटना बळकट करावी, बूथनिहाय क्रियाशील कार्यकर्त्यांची यादी तयार ठेवून संपर्क वाढवावा. शासनाने केलेल्या कामाची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी नूतन ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांचा सत्कार मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.