कराड : कोरेगाव तालुक्यात पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील भूसंपादन असो अथवा नुकसान भरपाईबाबत शासन निश्चितपणे बाधित खातेदार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नसल्याची ठाम ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.

कोरेगावात रेल्वेमार्ग दुहेरीकरणाविषयी महत्त्वपूर्ण बैठक आमदार घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता जितेंद्र कुमार, रेल्वे भूसंपादन लढ्यातील विकास थोरात यांच्यासह स्थानिक प्रशासन, बाधित शेतकरी, खातेदार उपस्थित होते.

गोडसेवाडी, दुधी, सासुर्वे, धामणेर, नेहरवाडी, टकले, बोरगाव, किरोली, तारगाव, नलावडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बैठकीत प्रकल्पाच्या अनुषंगाने समस्या मांडल्या. तर, गावनिहाय आणि जमिनीच्या गटनिहाय शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी याबाबत माहिती दिली. जितेंद्र कुमार यांनी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबरोबरच एकाही शेतकऱ्याला अडचण येऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत झालेली चर्चा गांभीर्याने घेत आमदार मनोज घोरपडे यांनी पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरण कामाच्या अनुषंगाने एका खातेदारावर किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचे ठामपणे सांगितले. सर्वसामान्यांच्या समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.