राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारल्याची टीका केली जात आहे. विधानपरिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, नागपूर आणि अकोला या जागांसाठी एकमत होऊ न शकल्यामुळे या ठिकाणी निवणुका झाल्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरात बावनकुळेंना ३६२ मतं

आज झालेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये नागपुरात एकूण ५४९ मतं वैध ठरल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी २७५ मतं मिळवणं आवश्यक होतं. यात भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना एकूण ३६२ मतं मिळाली असून रवींद्र भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे. तर काँग्रेसचे उमेदवार असलेले मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली आहेत. नागपुरात काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं सांगितलं जात आहे.

अकोल्यात वसंत खंडेलवाल यांना ४४३ मतं

एकीकडे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असताना दुसरीकडे अकोल्यातही हेच चित्र दिसून आलं. अकोल्यातील मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात तब्बल ४४३ मतं पडली होती, तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मतं पडली होती. या प्रक्रियेमध्ये ३१ मतं बाद ठरली.

काँग्रेसमध्ये ऐनवेळी घडलेलं नाट्य!

नागपूरमध्ये काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलल्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचं आता बोललं जात आहे. आधी छोटू भोयर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी पक्षानं उमेदवार बदलून छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे भोयर यांना या निर्णयाविषयी कोणतीही कल्पना नसल्याचं नंतर समोर आलं.

ऐनवेळी काँग्रेसमध्ये कशा घडल्या घडामोडी, वाचा सविस्तर!

“हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे परिणाम”

दरम्यान, या विजयाविषयी प्रतिक्रिया देताना भाजपाचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “३१८ मतं भाजपा आणि सहयोगी पक्षांकडे होती. २४० मतं महाविकास आघाडीकडे होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १८६ मतं मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मत त्यांना मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हुकुमशाही भूमिका, दोन मंत्र्यांच्या दबावाखाली पक्षाला वेठीस धरणे, काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते, मतदार अस्वस्थ होते. हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे हे परिणाम आहेत. यात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं की आपली मतं का फुटली. दोन दिवस त्यांनी घोडेबाजार केला, तरी त्यांना पक्ष एकत्र ठेवता आला नाही. हा खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव आहे. त्यांचे कार्यकर्ते इमानदारीने काम करण्यासाठी तयार होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाही. त्यांनी हतबल प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे”, असं ते म्हणाले.

“..म्हणून मतदारांनी त्यांना जागा दाखवली”

“भाजपानं आपली मतं एकत्र ठेवण्यासाठी एखादा प्रयत्न केला म्हणजे तो घोडेबाजार होतो का? आमचे मतदार एकत्र असणे ही भूमिका प्रत्येक पक्षाची असते. घोडेबाजार तर दोन रात्रींमध्ये झाला, जेव्हा दोन्ही मंत्री ते करत असताना संपूर्ण नागपूरनं पाहिला आहे. पक्ष म्हणजे आपण, दुसरं कुणी नाही ही त्यांची भूमिका होती. म्हणून मतदारांनी त्यांना जागा दाखवली आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlc elections in maharashtra bjp won nagpur akola seat shivsena congress ncp pmw
First published on: 14-12-2021 at 10:37 IST