MNS: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील का? याची चर्चा सुरु आहे. कारण महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात त्याआधी या दोघांची युती होईल अशी शक्यता आहे. मात्र दोघांकडून तशी थेट ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशी महाराष्ट्राची भावना असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत. तर मनसेकडून काही प्रमाणात टीकाही केली जाते आहे. दरम्यान प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
“गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जे काही शब्दांचे बाण सोडले जात आहेत त्यात कोण चूक कोण हा बरोबर नाही. पण एक सांगतो की आज मराठी माणूस थोडा व्यथित आहे. मराठी भाषा ज्यासाठी आपण लढा द्यायला पाहिजे ती मराठी भाषा या वाक्त्यां युद्धाकडे हताश होऊन पाहते आहे. मराठी माणसाच्या दरवाजावर, संस्कृतीवर एक संकट येऊ घातलं आहे आणि आम्ही (शिवसेना-मनसे) आपसात एकमेकांबाबत असं शत्रुत्व ठेवलं तर मराठी भाषेचं संरक्षण कोण करणार?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे. प्रकाश महाजन यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
सत्तेसाठी भाजपा कुठल्याही थराला जातात-प्रकाश महाजन
“सत्तेच्या सारीपाटावर सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जात आहेत. घटना छोटी असो की मोठी. एक प्रवेश झाला त्या व्यक्तीचा संबंध कुणाशी होता? दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीला भाजपाने प्रवेश देऊ शकतो मला रामदास नाईक आणि प्रेम शर्मा या दोघांचे चेहरे आठवले. भाजपा सत्तेसाठी हा विचार करत नाहीत. राज ठाकरे हिंदी सक्तीविरोधात लढा देत आहेत. सगळ्यांनी मिळून लढा दिला पाहिजे. संजय राऊत हे देशाच्या राजकारणात आहेत त्यांनी प्रगल्भपणे वागलं पाहिजे. दोनवेळा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले. बाळा नांदगावकरने मातोश्रीवर जाणं म्हणजे राज ठाकरेंनी तिथे जाण्यासारखंच आहे. कारण राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशी कुणी व्यक्ती मातोश्रीवरुन राज ठाकरेंकडे आली का?” असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मराठी माणूस माफ करणार नाही
“युती होईल की नाही हा विषय भविष्याच्या गर्भात आहे. मात्र एक विषय आहे की असं काही झालं तर इतिहास आणि मराठी माणूस कुणालाही क्षमा करणार नाही. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांना दोघांनाही मराठी माणूस क्षमा करणार नाही. ज्यांनी मराठी माणूस आणि त्याच्या स्वाभिमानाचा विडा उचलला आहे त्यांची एक चूक मराठी माणसाला आणखी १०० वर्षे मागे लोटेल. इतिहास त्याची नोंद घेईल ती काळ्या अक्षरातही असू शकते. असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. एकत्र लढा दिला तर वेगळा परिणाम होईल. परवाच्या एका मेळाव्यात हिंदीचा उल्लेखही करण्यात आला नाही”, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. महाजन म्हणाले, “मी आधीही म्हटलं होतं की एकदा काय ती चर्चा करा आणि कोंडी फोडा. पुढे यश येईल अपयश येईल ते माहीत नाही पण मराठी माणसाला किमान हे वाटेल की यांनी एकत्र यायचा प्रयत्न केला. आत्ता जे काही चाललं आहे ते पाहून मराठी माणूस आनंदी नाही.”