महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.

मनसेचे आमदार भाजपालाच मतदान करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्यावर शिकामोर्तब झाला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपालाच मतदान करतील, हे स्पष्ट झालं आहे. शेलार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा- रावसाहेब दानवेंनी मांजरांच्या पिल्लांसोबत केली महाविकास आघाडीच्या आमदारांची तुलना; नेमकं काय म्हणाले…

माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, “पक्षाच्या वतीने येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये मनसेचे मत भाजपाला मिळावे यासाठी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले. त्यामुळे मत आम्हाला पडणार असल्याने आमचा विजय आणखी सोपा आणि सुकर होणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले आमदार राजू पाटील यांना बोलावून घेतलं असून भाजपाला मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्या मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपाने ही संधी साधली.