सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सातारकरांनी वज्रमूठ बांधली आहे. या संमेलनाच्या निधीसाठी छोट्या घटकांकडून ९९, तर नोकरदार -व्यावसायिकांनी ९९९ रुपये देणगी द्यावी, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. या निधी संकलन अभियानासाठी आयोजकांनी ‘माझे ९९ रुपये’, ‘मी ९९९’ असा संदेश तयार केला आहे.

सातारा शहरात यंदा ९९वे संमेलन होणार आहे. सातारा जिल्ह्यात यापूर्वी अपूर्व उत्साहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. यात सर्वच स्तरांतील सातारकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ती दिमाखात पार पाडली. रुपयापासून ते लाखो रुपयांपर्यंत देणगी देऊन सातारकरांनी साहित्याचा सोहळा साजरा केला आहे.

यंदाही ९९ वे साहित्य संमेलन साताऱ्याला मिळाले आहे. हा साहित्योत्सव साजरा होण्यासाठी प्रत्येक सातारकराचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. संमेलनाला आर्थिक हातभार लावून हे संमेलन अलौकिक करण्याची संधी चालून आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी वाढणे आवश्यकच आहे. विद्यार्थ्यांचाही वाटा या संमेलनात असावा यासाठी त्यांनी किमान ९९ रुपये संमेलनासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आयोजकांनी ‘माझे ९९ रुपये’, ‘मी ९९९’ असा संदेश तयार केला आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत (९४२२६०४५०९)येथे संपर्क साधावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘९९‘ व ‘९९९’ हे का?

साताऱ्यात ९९ वे संमेलन पार पडत असल्याने किमान ९९ रुपये देणगी द्यावी, तर नोकरदार, व्यावसायिकांनी किमान ९९९ रुपये द्यावेत, अशी कल्पना पुढे आली. यातूनच निधी संकलनासाठी ‘माझे ९९ रुपये’, ‘मी ९९९’ असा संदेश तयार करण्यात आला आहे.