विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भापजावर मात केली आहे. नागपूर, औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर अमरावती मतदारसंघाची मतमोजणी अद्याप सुरू असून या जागेवरही महाविकास आघाडीचाच उमेदवार आघाडीवर आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात मात्र अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. काँग्रेस पक्षातून बंडखोरी करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या निवडणुकीतील विजयानंतर तांबे यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात घेतले जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. ते आज (३ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> MLC Election 2023 : भाजपाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीला मदत? नाना पटोलेंच्या विधानानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “अनेक नेत्यांनी…”

“नाशिकमध्ये आमच्यासोबत डॉ. सुधीर तांबे यांनी विश्वासघात केला. या मतावर मी आजही ठाम आहे. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी द्यावी, असे त्यांनी आम्हाला सांगितले असते, तर आम्ही सत्यजित यांना उमेदवारी दिली असती. आमचा तेथे विश्वासघात झालेला आहे. येथे भाजपाने खेळी केलेली आहे. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे निवडून येणार असे भाजपाचे अनेक नेते, मंत्री म्हणत होते. हे भाजपाने नियोजनबद्धपणे केले होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांना पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय हायकमांडच घेईल,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “उधार-उसनवारी करुन एक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल, असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे घर तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हाच त्रास आमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांनी आमचा एक नेता नेला. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही तयारी केली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असेही नाना पटोले यांनी सांगितले.