केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपाची सत्ता येण्याबाबत आज केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर आता राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“ भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातलं सरकार ५ वर्ष चालेल.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

तर, “ काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय.” असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.

याचबरोबर, “ नारायण राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकासआघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. या संख्याबळावरती हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते अनिल परब यांनी राणेंच्या विधानावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केली आहे. तसेच, यावेळी त्यांनी एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असंही राणेंनी बोलून दाखवलं आहे.