नांदेड : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने अत्यल्प भावात होणाऱ्या या भूसंपादन कार्यवाहीस विरोध आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील शेतकऱ्यांनी होळी केली. या निर्णयामुळे बाधित १२ जिल्ह्यांमध्ये रोष असून या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित केले जात आहे.
गेली दीड वर्षे बाधित शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. आता त्याला वेग देण्यासाठी सरकारी पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तिमेवार, प्रमोद इंगोले, प्रल्हाद इंगोले मारुती सोमवारे, कचरू मुधळ, दिलीप भिसे, शहानंद मुधळ, देवा इंगोले, रवी इंगोले, मारुती इंगोले, दशरथ स्वामी, धोंडीरामजी कल्याणकर, दिलीप कराळे, आनंदराव नादरे, सोनाजी बुट्टे, सुभाष बुट्टे यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.